देशीची गंगा

हि माझी कविता तशी खूप जुनी. अगदी लहान वयात लिहिलेली. लहान म्हणजे अगदीच लहान नव्हे की. संत ज्ञानेश्वरांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेत सांगायचं झालं तर माझ्या गवऱ्या नदीला गेल्या होत्या. पंचविशीचा होतो मी तेव्हा. पण काय आहे आम्ही सुधारलोत………प्रगत झालोत. पण आमच्या मोठेपणाच वय वय मात्र वाढत गेलं. अगदी एक पोर झालं तरी आम्ही स्वतःला लहानच समजतो.

असो. ‘ शंभर सावरकर हवेत ‘, ‘ नको पुढारी…….जय वारकरी ‘, ‘  हे म्हणे देशाचे आधारस्तंभ !’ यासारखे लेख वाचल्यावर तुम्हाला वाटेल या माणसाचा मुळी आपल्या देशावर प्रेमच नाही. सारखी आपली न्कार्घ्न्ता वाजवत असतो. पण तसं नाही मित्रांनो. माझ्या मातीवर माझं अगदी जीवापाड प्रेम आहे. पण आमच्या पुढाऱ्यांनी इथं जी काही बजबजपुरी माजवली आहे ती पहिली कि जीव अगदी नकोसा होतो.

खून………..बलात्कार………..लाचखोरी………….भ्रष्टाचार………अशी असंख्य भुतं भोवती फेर धरून नाचत असतात. यातून आम्हाला बाहेर कोण काढणार ? श्रीरामांच्या या भूमीत पुन्हा सत्ययुग कधी येणार ? असे अनेक प्रश्न मला अगदी कासावीस करतात.

पण या भूमीवर सत्ययुग आणण्याचा पवित्र कार्य आपल्यालाच करावा लागणार आहे. एक नकार घंटा वाजवून मी माझं काम करतो आहे. पण असे हजारो, लाखो हात जेव्हा नकार घंटा वाजवू लागतील आणि नकार घंटा वाजवीत एक दिवस रस्त्यावर येतील तेव्हा…………तेव्हा उगवेल माझ्या माती पुन्हा एक नवा सूर्य. प्रश्न आहे तो एवढाच कि इंग्रजांची सत्ता उलथवून टाकायला आम्हाला दीडशे वर्ष लागले मग आमच्या या स्वार्थी राजकारण्यांची मनमानी सत्ता उलथवून टाकायला आम्हाला किती वर्ष वाट पहावी लागणार, एवढाच !

बापुजींनी या देशात दारूबंदीच स्वप्न पाहिलं होतं. पण आमच्या या पुढाऱ्यांनी गल्लोगल्ली देशी दारूची दुकानं उघडायला परवानगी दिली. प्रत्येक शहरात हजारो ‘ बार ‘ ला परवाने दिले. त्यातून अनेकांच्या हप्त्याची सोय झाली…………. पण सामान्य जनता मात्र अंधाराच्या गर्तेत ढकलली गेली.

पण अंधाराच्या कुशीतूनच सूर्याचा जन्म होतो.

मी वाट पहातोय नव्यानं जन्माला येणाऱ्या सूर्याची !!!!!!!!!


About this entry