शरादाला चांदणं

खूप दिवसांनी लिहितोय आज. दिवाळीनंतरचा प्रत्येक रविवार शेतावर गेलाय. नुसतीच पळापळ चालू आहे. पण लवकरच निवांत होईन. मग लिहीन खूप काही. खरंतर आजही वेळ नव्हताच लिहायला. पण वेळ नाही म्हणत  म्हणत किती दिवस लेखणी बाजूला ठेवायची. तेव्हा म्हणलं आज लिहूच या. शिवाय घटनाही घडलीय तशीच.

तुम्ही म्हणाल, ” विजयजी लिहाना काय लिहायचं ते. नमनालाच घडाभर तेल कशाला हवाय. एखादी झकास प्रेम कविता पडूद्या आमच्या पदरी.”

पण तुम्ही प्रेम कवितेची अपेक्षा करत असलात तरी मी कोणत्या विषयावर येवढा बाह्या सरसावून लिहायला बसलोय याची जाणीव असेल तुम्हाला.

होय. हरविंदरसिंग या तरुणानं शरदरावांना चांदणं दाखवला त्याविषयी.

नाही, नाही !!!!!!!  मी समर्थन नाही करत त्या घटनेचं. समाजसेवेच्या नावाखाली राजकारणात पाय पसरून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या या पिपासू मंडळींना खरंतर अशी मारहाण करून काहीच फायदा होणार नाही. आपली नाराजी व्यक्त करायची असेल तर त्यासाठी मतदान पेटी हे साधन आहेच. पण आपला आता मतपेटीवरही विश्वास उरला नाही. सोम्या आला काय आणि गोम्या आला काय. तो त्याच्याच सात पिढ्यांसाठी सरकारी तिजोरी लुटणार हे आपल्या मनावर पुरेपूर ठसलय.

गेल्या दोनचार वर्षात राजकीय नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. अगदी राहुल गांधीही सुटले नाहीत यातून. त्यामुळेच अशा तरुणांना माथेफेरू ठरवण्यापेक्षा सगळ्याच राजकारण्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. अन्यथा अशा हल्यात यापुढे आणखीही वाढ होईल हे निश्चित. कारण आजकाल शाळकरी मुलांची खिचडी असो, रस्त्यांची चौपदरी करणाची योजना असो, वीज निर्मिती असो कि अन्य कोणतीही योजना असो. त्या राबवताना जनकल्याणापेक्षा आपल्या पदरात काय आणि किती पडणार याचाच विचार अधिक केला जातो.

कारण मला सांगाना, ” शाळेत येणाऱ्या आमच्या मुलांना खिचडी द्या किंवा त्यांना मोफत वह्या पुस्तक द्या.” असं कुणी कधी सांगायला गेलं होतं का हो शासन दरबारी ? मग का आणि कुणाला विचारून हे अशा योजना राबवतात.

महागाई तर वाढते आहेच पण शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सामान्य माणसं भाव वाढताहेत म्हणून रस्त्यावर येताहेत. तर शेतकरी पिकांना योग्य भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करताहेत. पुढार्यांना मात्र कशाचीच झळ बसत नाही. का होतंय असं ?

महागाई विषयीचा आणखी एक किस्सा नंतर लिहीन.

आणि शरद पवारांना मारहाण झाली म्हणून एवढी आग पाखड करणाऱ्या राजकारण्यांना परवा दिल्लीत एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणारे चार केंद्रीय मंत्री दिसले नाहीत काय ? तेव्हा मात्र प्रत्येक पुढारी त्या केंद्रीय मंत्र्यांचा समर्थनच करत होता. तेव्हा त्या मंत्र्यांना का कुणी माथेफेरू ठरवलं नाही. कारण या सगळ्यांना माहिती आहे. आपण सारेच या देशाचे लचके तोडतो आहोत. एकमेकांना सांभाळून घ्यायलाच हवं .

या सगळ्या प्रकारात मिडीयाचही कौतुक करायला हवं. कारण ती चित्रफित व्हायब्रेट करून त्यांनी शरद पवारांची खूप लाज राखली. पण खरंच असं करायची गरज होती ?


About this entry