चंद्रभागेतीरी विटाळले मन.
‘ माझे माहेर पंढरी ‘ पंडित भीमसेन जोशींनी किती आर्ततेने हे भक्तीगीत गायलंय. गोऱ्यासाठी चिखल तुडवणारा आणि जनाबाईला दळण दळू लागणारा विठोबा पंडितजींच्या समोर का नाही येऊन उभा रहिला ? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. परवा पंढरपूरला गेलो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आम्हा भक्तांपेक्षाही तिथल्या बडव्यांनी आणि पुजाऱ्यांनी विठीबाला अगदी कैद करून टाकलंय. आम्हा भक्तांना विठोबाचं नखही दृष्टीस पडू न देणाऱ्या या बडव्यांचा उद्धार हा विठोबा करतोच कसा ?
मला एक प्रसंग आठवतोय.
आई वडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून प्रत्यक्ष विठोबालाही ताटकळत ठेवणारा पुंडलिक खरंच थोर. विठ्ठलाच्या आधी त्याचं दर्शन घ्यावं असं आमचा वारकरी संप्रदाय मानतो. म्हणून आम्ही सहकुटुंब पुंडलिकाच्या भेटीसाठी गेलो.
चंद्रभागेला पाणी घोटाभर. आम्हा माणसांची सारी पापं वाळूवर पसरलेली. चंद्रभागेला अर्पण केलेले सारे ब्लावूजचे पीस…..नारळ…….दिव्यांचे द्रोण या सगळ्यांचा वाळूवर खच पडलेला. आमच्या मागून आमच्या सौ आणि भावाच्या सौभाग्यावातीही तेच सारं पदरात घेवून चंद्रभागेच्या तीरावर पोहचल्या. मी म्हणालो, ” हे काय ? “
म्हणाल्या, ” काही नाही. हे चंद्रभागेला अर्पण करतात.”
” कशासाठी ? “
उत्तर. ” माहित नाही. “
” ठीक आहे. माहित नाही तर. परत करा.” मी.
” असं करू नका हो. चंद्रभागेची ओटी भरायची असते.” सौ अगदी काकुळतीला येऊन म्हणाली.
दोघींनी. द्रोणातले दिवे लावले. चंद्रभागेला अर्पण केले. खणा ( ब्लावूज पीस ) नारळानं चंद्रभागेची ओटी भरली. भक्तीभावान नमस्कार करून बोटाएवढ्या प्रवाहातून माघारी आल्या. आम्ही पहात होतो. एक मुलगी प्रवाहातले नारळ गोळा करून ओचीत भारत होती. या बरोबरच मी त्यांना पुंडलिकाच्या मंदिराभोवती पडलेला चंद्रभागेला अर्पण केलेल्या ब्लावूज पीस…..नारळ…….दिव्यांचे द्रोण या सगळ्यांचा खच दाखवला. आणि आम्ही ठरवून टाकलं या पुढे असं काही करायचं नाही. मंदिराभोवतीचा कचरा पाहून पुंडलिकाच्या दर्शनाला जाण्याची इच्छाच झाली नाही.
कुणी जर, ” देव तुमची परीक्षा पहात होता. एवढ्या साऱ्या दुर्गंधीतूनही तुम्ही त्याच्या पायाशी जातंय का नाही हे पहात होता. ” असं जर म्हणत असेल. तर माझा नाईलाज आहे.
विठ्लाच्या दाराशी गेलो. दुरूनच त्याचं दर्शन घेतलं. मनात म्हणालो, ” खूप भक्तीभावानच तुझ्या दारी आलो होतो. पण तुझी तुझी गळाभेट न घेताच माघारी निघालोय. पदरात घे.”
मन प्रसंन्न होण्याऐवजी विटाळलं होतं. पण हा विटाळ विठ्ठलाचा नव्हता. तर माणसांनी माजवलेल्या बजबजपुरीचा होता. आम्ही महाराष्ट्रीयन माणसं अशीच. आम्हाला आमच्या देवाचं देवपण तर जपता आलं नाहीच. पण त्याचं बाजार मात्र फार शिताफीनं मांडता आलं. कुठल्याही मंदिरात ‘ फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. ‘ हा फलक दर्शनी भागात झळकत असतो. ‘ का हो आम्हाला आमच्या देवाचं फोटो काढण्याचीही मुभा नाही.’ जिथं आम्ही आमच्या देवाचं दर्शन घेवू शकत नाही तिथ तो आम्हाला प्रत्यक्ष दर्शन कसं देणार ?
कळलं ? खूप आर्ततेने ‘ माझे माहेर पंढरी ‘ हे भक्तीगीत गाणाऱ्या पंडित भीमसेन जोशींच्या समोर विठोबा का नाही येऊन उभा रहिला ते ?
चंद्रभागेच्या तीरावर गेल्यानंतर मन प्रसन्ना होण्याऐवजी उदास झालं. त्याची हि छायाचित्र.
About this entry
You’re currently reading “चंद्रभागेतीरी विटाळले मन.,” an entry on रे घना
- Published:
- December 22, 2011 / 7:32 am
- Category:
- लेख, सामाजिक , राजकीय





No comments yet
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]