इंडियंस आर ग्रेट

हिदुस्तानात सम्राट अशोका पासून गौतम बुद्धांपर्यंत अनेक महात्मे होऊन गेले.

याच मातीत स्वात्यंत्र वीर सावरकर, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, यासारखे हुतात्मे जन्मले.

याच मातीत रंगली बाजीराव – मस्तानीची प्रेम कहाणी.

ताजमहालच्या रुपात याच मातीवर उभी राहिली प्रेमाची निशाणी.

सत्तेसाठी हपापलेल्या सत्ताधुंद राजकारण्यांनी या मातीची हि ओळख पुसून टाकायचा अगदी चंगच बांधलाय.

पण तरीही या मातीची ओळख सांगणारे या मातीत निपजतातच. खेळाच्या मैदानावर तर हे प्रकर्षानं जाणवत.

मला आठवणारं सुनील गावस्कर हे त्यातलं पाहिलं नाव. अंपायरनं बोटवर करायच्या आधी मैदानातून परत फिरणारं.

सचिन तेंडुलकर हे आणखी एक नाव कुणाच्याही स्लेजिंगला उत्तर न देणारं. शतकांमागून शतकं करणारं. शतकांच शतक करू पाहणार.

खरंतर या विश्वकपमध्ये सचिनच्या शतकांच शतक व्हायला हवं होतं.

पण आफ्रिदी शिंकला. म्हणाला,” आम्ही सचिनचं शंभरावं शतक होऊ देणार नाही.” आणि खरंच त्यानं सचिनचं शंभरावं शतक होऊ दिलं नाही आणि खाली मान घालून निघून गेला.

हे सारं लिहिण्याला एक कारण झालं.

आजची आय. पी. एल. ची. म्याच.

रॉयल चायलेंज बंगलोर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्सची.

जिंकायला धावा उरलेल्या २.

मैदानात खेळताहेत ख्रिस गेल आणि विराट कोहली. गेल ९८ धावांवर. फलंदाजी करत होता विराट मनाचा कोहली. एक दोन वेळा १ धाव काढायची संधी होती. पण विराटनं ते टाळलं. आख्खं षटक निर्धाव खेळून काढलं. त्यात एक दोनदा बाद होता होतही वाचला. मध्येच एक चेंडू वाईड पडला. गेलची शतकाची संधी हुकते कि काय म्हणून विराटला वाईटही वाटलं. समोरच्या गोलंदाजाला त्यानं नाक मुरडलं.

षटक संपलं. गेलला स्ट्राईक मिळाली. त्यांना चौकार मारला. शतक केलं. विराट खूष.

तेव्हा आठवलं ‘ कुठं सचिनचं शंभरावं शतक होऊ नये म्हणून बिब्बा घालणारा आफ्रिदी आणि कुठं गेलचं शतक व्हावं म्हणून विजयी फटक्याचा मोह आवरून एक आख्खं षटक निर्धाव खेळून काढणारा कोहली.’

म्हणूनच म्हणतोय. ‘ इंडियंस आर ग्रेट ‘

क्रिकेटमधली अंधश्रद्धा

अंधश्रद्धा किती प्रकारच्या असतात !!!

साप दुध पितो.
नागाच्या डोक्यावर मनी असतो.
सर्प धनाचे रक्षण करतो.
सापाच्या अंगावर केस असतात.
मनोहर जोशींचा गणपती दुध पितो.
वडाच्या झाडावर भुतं रहातात.

अशा एक ना अनेक अंधश्रद्धा.

अशीच एक अंधश्रद्धा क्रिकेटमध्येही आहे. ती म्हणजे –

‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘

अगदी एवढयात पार पडलेल्या विश्व चषकाच उदाहरण घ्या ना. उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यात आपण सचिनच्या शतकांच्या शतकाची आतुरतेनं वाट पाहत होतो. त्यासाठी मनोमन प्रार्थनाही करत होतो. पण आपली इच्छा काही फळाला आली नाही. सचिनचं शंभरावं शतक या विश्वचषकात पाहण्याचं भाग्य आपल्या नशिबी नव्हतं. पण पाकिस्तानला धूळ चारतानाच आपण श्रीलंकेलाही आस्मान दाखवलं. आणि मोठ्या दिमाखात विश्वचषक आपल्या घरी आणला.

‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘ हे मी अनेकांच्या तोंडून ऐकलय. काही वेळा मी स्वतःही अनुभवलंय.

अगदी कालचीच घटना.

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोची टस्कर्स सामना. सचिनचं २०-२० मधलं पाहिलंवहिल शतक. मुंबईचा १८२ असा मजबूत स्कोर. मुंबईन आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकलेले आणि कोचीला अजून खातं उघडायचं होतं. म्हणलं आता मुंबई जिंकणारच. पण कसलं काय कोचीन १ षटक राखून सामना जिंकला. झालं –
‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘ हि अंधश्रद्धा अधिक गडद झाली.

सचिनला भारतरत्न ???

सचिन महान आहे या विषयी मलाच काय पण जगात कुणालाही शंका असण्याचं काही एक कारण नाही. आज गानकोकिळा लतामंगेशकरांपासून आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह साऱ्यांनीच सचिनला भारतरत्न पुरस्कार द्यावा असा सूर लावलाय. पृथ्वीराज चव्हाणांच काय जातंय ? उलट या माध्यमातूनही ते त्यांच्या पदरी जनतेची सहानभूती पाडून घेणार आहेत. लता मंगेशकरांनी तर काय सचिनला स्वतःचा मुलगाच मानला आहे. आपल्या मुलाला भारतरत्न हा या देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळावा असं कोणत्या आईला वाटणार नाही ?

अगदी मलाही सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळावा असंच वाटत. पण भारतीय संविधानात तशी तरतूद नाही.

भारतीय संविधानात, ”   भारत रत्न हा किताब फक्त कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच दिला जावा. ” असं म्हटलं आहे.

पद्म विभूषण पुरस्कारात मात्र क्रीडाक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

या कायदेशीर बाबी बाजूला ठेवल्या तरी सचिनला भारत रत्न पुरस्कार देण्याची काही गरज नाही असं मला ठामपणे म्हणावसं वाटत.

त्याचं मुख्य कारण म्हणजे –
” सचिनला भारत रत्न देणं म्हणजे खऱ्या मोत्यावर कृत्रिम मुलामा चढवण्यासारखं आहे.”

दुसरी गोष्ट म्हणजे –
सचिनची कामगिरी खूप महान आहे. त्याला भारत रत्न पुरस्कार द्यायचा असेल तर कायद्यात बदल करायलाही हरकत नाही. पण एकदा का कायद्यात बदल झाला कि आमचे पुढारी खिरापतीसारखी त्या पुरस्काराची वाटप करत सुटतील. त्यामुळेच सचिनला हा पुरस्कार द्यायचा असेल तर कायद्यात बदल करण्याऐवजी आमच्या राष्ट्रपतींनाच या विषयी निर्णय घेऊ द्यावा.

आणखी एक गोष्ट अशी –
कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामगिरीतून समाज घडत जातो म्हणून अशा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देणं न्यायचं आहे. परंतु सचिनची कामगिरी त्या तोडीची नाही. सचिननं ज्या रीतीनं स्वतःची कारकीर्द घडवलीय आणि मैदानात इतरांसमोर जो आदर्श ठेवलाय त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. देशातले अनेक तरुण आपण सचिन व्हायचं असं स्वप्नं उराशी बाळगतील. पण आयपीएल आणि रणजीचा विचार केला तरीही अगदी मुठभर लोकांपुरताच हा परिणाम असणार आहे संपूर्ण समाजावर नाही.

शिवाय तरुण पिढी जेव्हा महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, टाटा, बिर्ला यासारख्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेवते तेव्हा त्याच्या परिणाम समाजाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत होतो.

साहित्यक्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा हा पुरस्कार दिला जातो तेव्हा त्या लेखकाच्या साहित्यकृतींनी संपूर्ण समाज ढवळून काढलेला असतो आणि समाजाला एक योग्य दिशा दिलेली असते.

सचिनची कामगिरीही समाज ढवळून काढणारीच आहे पण त्याच्या कामगिरीचा समाजाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीवर होणारा परिणाम मात्र फारच मर्यादित स्वरूपाचा असेल.

नावारूपाला आलेल्या व्यक्तीला पुरस्कार देणं हे आता एक फ्याड झालं आहे.

म्हणूनच खरंतर या गोष्टीची देशभर एवढी चर्चा सुरु असताना सचिननं स्वतःच विनम्रपणे हा पुरस्कार नाकारायला हवा.