संध्याकाळी कुटुंबासोबत अनेकदा वेगवेगळ्या टिव्ही मालिका पहाण्याचा योग येतो. ‘ पुढचं पाऊल ‘ , ‘ देवयानी ‘ , ‘ लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती ‘ , ‘ स्वप्नांच्या पलीकडले ‘ अशा मराठीतल्या कितीतरी टिव्ही मालिकांची नावं घेता येतील. स्वयंपाक पाणी सातच्या आत उरकून बहुतेक महिला टिव्हीचा रिमोट हाती घेऊन बसलेल्या असतात. महिलांमध्ये चालणाऱ्या भ्रमणध्वनीवरील संभाषणात किंवा फावल्या वेळातील गप्पात बऱ्याचदा या मालीकांवरील चर्चा रंगलेली असते. माझ्या बायकोची पाच वर्षाची भाची केतकी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीतील गप्पात वेगवेगळ्या मालिकांवरील रसग्रहणात अगदी तल्लीन होऊन जाते.
ऑफिसातील पुरुषांच्या लंच टेबलवरील गप्पांचा मूडही असाच असतो. पण त्याला झालर असते ती ‘ इंडियन आयडॉल ‘ निवडणाऱ्या विविध नाचगाण्यांच्या, एखाद्याला करोडपती बनविणाऱ्या मालिकांची.
‘ पुढचं पाऊल ‘ , ‘ देवयानी ‘ , ‘ लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती ‘ , ‘ स्वप्नांच्या पलीकडले ‘ या मालिकांमधली जी काही ओझरती दृश्य आणि कथानकं माझ्या इंद्रियानपर्यंत पोहचली तेव्हा जीव तळमळला. प्रत्येक मालिकेत तेच ते. कुटुंबातले कलह ( प्रेमाचा त्रिकोण हा विषय आता कालबाह्य झाल्यासारखा वाटतोय ), परस्परात चाललेली कटकारस्थानं, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा चाललेला प्रयत्न एवढंच. बरं या सगळ्या कटकारस्थानात पुढं असतात त्या स्त्रियाच. यात सासू विरुद्ध सून असते……..जावे विरुद्ध जाव असते………भावजयी विरुद्ध नणंद असते ? यातली एक प्रवृत्ती वाईट तर दुसरी प्रवृत्ती चांगली असते.
नेहमी सत्याचाच विजय होतो या न्यायाप्रमाणे चांगल्या प्रवृत्तीचाच विजय होत असावा. होत असावा असं यासाठी म्हणतोय कि सहा सहा महिने वर्ष वर्ष चालणाऱ्या या मालिकेत सुरवात कुठे झालेली असते हेच आठवत नसतं. मग शेवट चांगला कि वाईट हे कोणत्या कसोट्यांवर पाजळून पहाणार. बरं येवढ्या मोठ्या कालावधी या मालिकांमधून इतक्या वाईट व्यक्ती आणि वृत्ती पाहिलेल्या असतात कि चांगलं हाती काही लागण्याची सुतराम शक्यता उरलेली नसते. यातल काय घ्यायचं आजच्या पिढीनं ? काय साधतात या टिव्ही मालिका ? कोणता संस्कार करतात आमच्या नवी स्वप्नं पहाणाऱ्या पिढीवर ? कोण चाप लावणार या साऱ्याला ? कि हे सगळं असंच चालू रहाणार ?