एकदा माणसाला मोठेपण लाभलं कि ती काय काय विधान करतील याचा काही नेम नाही. तशी हि माणसं नेहमीच तोलून मापून बोलतात पण तरीही कधी कधी घसरतात.
” स्त्रियांनी अर्धवट आणि तंग कपडे घातले तर बलात्कारच होतील. ” हे एका स्त्रीचं विधान. ( खरंतर या विधानाची छायांकित प्रतच मला इथं द्याची होतो. पण ते वर्तमान पत्र मला न मिळाल्यानं मी सदर लेखनातून ते नाव वगळल आहे. पण ज्यांना सदर विधानाविषयी शंका असेल त्यांनी १२ डिसेंबरचा लोकमत किंवा पुढारी पहावा. दोन्हीपैकी कोणत्यातरी एका वर्तमान पत्रात मी सदर वाक्य वाचलं आहे. ज्या रसिकांना सदर वाक्य कोणत्या वर्तमान पत्रात वाचलं आहे हे आठवत असेल त्यांनी कृपा करून अभिप्रायातून कळवाव.)
नशीब हे एका स्त्रीचे उद्गार होते. एखाद्या पुरुषाच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले असते तर केवढं रान पेटलं असतं. केवळ एका आदरणीय स्त्रीनं हे विधान केलं होतं म्हणून त्यावर फारसा गहजब मजला नाही.
मला मात्र फार वाईट वाटलं. त्यांनी हे आईच्या भूमिकेतूनच सांगितलं असेल हेही मला मान्य आहे. पण बदलत्या काळाची, बदलत्या फ्याशनची दखल त्यांनी घेतलेलीच दिसत नाही. त्या अजून त्यांच्याच जमान्यात वावरत आहेत. याचा अर्थ मी देह प्रदर्शन करणाऱ्या फ्याशनची पाठराखण करतो आहे असं मुळीच नाही. तसं असतं तर मी लो कट to हाय हिल्स हा लेख लिहिलाच नसता.
पण, ‘ तरुणी अपुरे आणि तंग कपडे वापरतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात.’ असं म्हणणं म्हणजे फारच झालं. याच विधानाचा आधार घेऊन एखादा नराधम जर, ” माझी काही चूक नाही तिनं कपडेच तसे घातले होते म्हणून तिच्यावर बलात्कार करण्याची मला इच्छा झाली. ” असं म्हणू लागला तर !!!
एखाद्या अपुऱ्या, तंग कपड्यातल्या तरुणीला पाहून कुणाही सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात त्या तरुणीवर बलात्कार करावा अशी इच्छा मुळीच निर्माण होणार नाही. अगदी माझी स्वतःचीच मानसिकता सांगायची झाली तर मला घृणाच वाटते अशा स्त्रीकडे पाहून.
त्यामुळेच बलात्कार करण्याची इच्छा निर्माण होण्याला त्या त्या व्यक्तीमधली पाशवी वृत्तीच कारणीभूत असते. अशा नराधमांना अपुऱ्या ………..तंग कपड्यातल्या तरुणीच उद्दीपित करतात असंच नव्हे तर, त्यांच्यातली पाशवी वृत्ती जागी होते तेव्हा त्यांना कसलीही स्त्री चालते……..अगदी वेडिविद्रीही. तीही मिळत नाही तेव्हा असे नराधम अंगभरकपडे असणाऱ्या एखाद्या आठ – दहा वर्षाच्या मुलीचा घास घ्यायलाही मागे पुढे पहात नाहीत.
तरुणींनी संयमानं वागायला हवं हे जरी खरं असलं तरी अशा पाशवी वृत्तीला पाठीशी न घालता त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे यासाठीच प्रत्येकानं पाठपुरावा करायला हवा………….अगदी देहांत प्रायश्चित्त एवढ्या कठोर शिक्षेसाठीही.