किती दिवस खदखदतंय हे सारं माझ्या मनात. खूप चीडचीड होते. अगदी भ्रष्टाचाराच्या विरोधातलं रामदेव बाबांचं आंदोलन उधळलं गेलं तेव्हापासून खूप चडफड होतेय मनाची. वाटत आपण सारे खरंच षंढ आहोत. सारं गुमान सहन करणारे सत्तेच्या हातातले बाहुले आहोत. जात्याचा खुंटा त्यांच्या हातात आम्ही भरडले जाणारे दाणे.
आणि वर हे अकलेचे तारे तोडणारे कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग. राजकारणाचा माज सत्ताधाऱ्यांच्या अंगात किती मुरलाय हे क्षणा क्षणाला प्रत्येक पावलाला दिसतंय. हि मंडळी बाह्या सरसावून आणणांवर आणि रामदेव बाबांवर चिखल फेक करीत होती. आणि आम्ही काही करू शकत नव्हतो. करू शकत नव्हतो म्हणण्यापेक्षा करत नव्हतो. पण आता पुरे किती दिवस आपण अशी बघ्याची भूमिका घेणार. हे एक नाही दहा हाताना देशाला लुटणार. शिवाय यांचे हात अदृश्य. नाट्य गोताय्गोत्यांच्या रुपातले. घोटाळ्यांचे यातले बहुतेक आकडे कोटीत. कधी कधी मला वाटतं रावणांना दहा तोंडांनी जेवढं विध्वंस केला नसेल तेवढा विध्वंस हि मंडळी करताहेत.
खरंतर आपण प्रत्येकानेच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. पण आपण पडलो पोटार्थी. आमच्यातुनच जन्माला आले होते सावरकर, आमच्यातूनच गरजले होते लोकमान्य टिळक, आमच्यातलेच भगतसिंग …राजगुरू….सुखदेव गेले होते फासावर या साऱ्यांचा आम्हाला विसर पडलाय.
आम्ही मतदार आहोत. आम्हीच निवडून देतो हे लोकप्रतिनिधी. पण आम्हाला आमचा तो हक्कही नीट बजावता येत नाही. गोर गरीब मतदान करतात. त्यांची मतं विकत घेतली जातात. पण सुशिक्षित म्हणवणारे आमचा अधिकारही विसरून जातो. पण आता आम्ही असं हात बांधून चालणार नाही. जागं व्हायला हवं. मुसक्या बांधायला हव्यात. आमचे पूर्वज परकीयान विरुद्ध लढले. पण अमेरिकेचा स्वतंत्र लढा घ्या. फ्रेंचची राज्य क्रांती घ्या. तिथल्या जनतेचे हे उठाव स्वकियांविरूद्धच होते. आता आम्हालाही जागं व्हायला हवं. मुसक्या बांधायला हव्यात.