मला आठवतंय मी लहान होतो तेव्हा आमच्या खेळात एखादं लहान पोर लिंबू – टिंबू असायचं.
विटी – दांडू खेळताना या लिंबू – टिंबूला विटी जेवढी लांब गेली असेल त्या अंतराच्या अर्धीच लंगडी घालावी लागायची.
गोट्या खेळताना त्याला अर्ध्या अंतरावरूनच चकायला दिलं जायचं.
क्रिकेट खेळताना त्याला हाप पीच बॉलिंग टाकली जायची.
त्याच्यावर सारखं सारखं राज्य आलं कि ते आमच राज्य न देता पळून जायचं.
याला म्हणतात लिंबू – टिंबू.
त्यामुळंच परवा जेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉनटिंगनं केनिया, क्यानडा यासारख्या संघांना लिंबू टिंबू म्हणाला तेव्हा मला फार वाईट वाटलं.
याच केनियान सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती याचा पॉनटिंगला विसर पडला कि काय ? आणि भल्या भल्या संघांनाही आपण ७० – ८० रनात आउट होताना पाहिलं नाही काय ? १९८१ ला झिम्बाब्वेन भारताची ५ बाद १७ अशी केलेली अवस्था कोण विसरलं असेल ? आणि तेव्हाच भारतानं विश्वचषक जिंकलाच ना ! आणि हा विश्वकप आम्ही जिंकला तेव्हा आमचा देश तरी कुठे असा क्रिकेटमधला वाघ होता ! कुणी सांगाव पुढचा वर्ल्डकप केनिया किंवा नेदरल्यांडही जिंकेल.
फुटबॉलच्या कितीतरी आधीपासून क्रिकेट खेळ खेळला जातोय पण तरीही फुटबॉलच्या विश्वचषकात सामील होणारे संघ २५ च्या वर आणि क्रिकेटच्या विश्वचषकात आत्ताशी कुठे १४ संघ सामील होताहेत. आणि त्यातल्याही काही संघांना आम्ही लिंबू टिंबू म्हणतोय.
त्यामुळेच माझी आयसीसीला अशी नम्र विनंती आहे कि, या कथित दुबळ्या संघांना असं एकेकी क्रिकेटमधून हद्दपार करू नये. फार तर या संघांविरूद्धचे सामने संपूर्ण ५० षटकांच्या ऐवजी २५ षटकांचे खेळवले जावेत. अर्थात रिकी पॉनटिंगसह सर्वच कर्णधारांची आणि देशांची याला संमती मिळायला हवी हे नक्कीच.